Header Ads

अनियमित सेवेने ग्राहक त्रस्त



बालगाव - ग्रामीण भागातील मोबाईल ग्राहक अनियमित सेवेने त्रस्त झाले आहेत. यामुळे ग्राहकांना संवाद साधण्यात व्यत्यय येतो. याची दखल घेत सेवा सुरळीत करावी, अशी मागणी तक्रारींद्वारे केली जाते; पण यात सुधारणा होत नसल्याचे दिसते. यामुळे दोष कायम आहे.

अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी
उमदी- शहरातील वर्दळीच्या मार्गावर वाहने अस्ताव्यस्त पद्धतीने उभी केली जातात. यामुळे मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी होते. येथे पार्किंग झोन देण्याची मागणी आहे; पण याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने ही कोंडी वाढत आहे.

पेट्रोल पंपावरील सुविधा नाममात्र 
जत - प्रत्येक पेट्रोलपंपावर स्वच्छतागृह, ग्राहकांकरिता पिण्याचे पाणी, वाहनांच्या चाकात मोफत हवा भरण्याची सुविधा पुरविणे नियमानुसार बंधनकारक आहे; पण या नियमावलीला पेट्रोलपंप चालक छेद देताना दिसतात. या सुविधांची पुर्तता केली जात नसल्याची ओरड सामान्यांतून होत आहे.

मोबाईल इंटरनेटमुळे सायबर कॅफेवर संक्रांत
जत - प्रत्येकाकडे स्मार्टफोन आल्याने सायबर कॅफेवर संक्रांत आली आहे. काही वर्षांपूर्वी इंटरनेट सुविधा केवळ सायबर कॅफेमध्येच उपलब्ध होती. यामुळे तेथे युवकांची गर्दी दिसत होती; पण काळानुरूप यात बदल झाल्याने अनेक युवकही बेरोजगार झाल्याचे चित्र पाहावयास मिळते.

गतिरोधकांवर पांढरे पट्टेच नसल्याने अपघाताचा धोका
जत - प्रवाशांना गतिरोधक दिसावे म्हणून त्यांच्यावर पांढरे पट्टे मारले जातात; पण शहरातील नव्याने जत- सांगली रोड व इतर मार्गावर गतिरोधकांवर असे पट्टेच दिसत नाही. मारलेले पट्टे मिटले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. याचा वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे. 

बसेसला फलक नसल्याने अडचण
जत- आगारातील अनेक बसेस भंगारावस्थेत आहे. यातील अनेक बसेस कोणत्या गावाला जात आहेत, याबाबतचे फलकही राहत नाही. यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो. याबाबत विचारणा केल्यास अपमानास्पद वागणूक दिली जाते. याकडे लक्षदेणे गरजेचे झाले आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.