Header Ads

भाजपने निवडणुकीत मित्र पक्षाचा धर्म निभावावा | अजितकुमार पाटील यांनी भाजप पक्ष श्रेष्ठीवर डागली तोफ

जत,प्रतिनिधी : काम सरो आणि वैद्य मरो ही आजपर्यत जिल्हा भाजपची निवडणूक रणनिती असली तरी जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप हे याला जिल्ह्यात अपवाद आहेत. विलासराव जगताप यांनी आजपर्यत अशी रणनिती कधी आखली नाही त्यांनी कायम मित्र पक्षाला सोबत घेतले पण जिल्ह्यात ही परिस्थिती दिसत नसल्याचा टोला लगावत जगताप यांच्या पाठीशी आम्ही मित्र पक्ष म्हणून खंबीर उभा राहून भाजपसोबत मित्र पक्षाचा धर्म निभावणार यात शंका नाही. रासप स्वाभिमानी आहे व राहणार आहे. तेव्हा भाजपने मित्र पक्षाचा धर्म निभावावा असे आवाहन रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील यांनी केले.







पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजप व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ जत येथे मित्र पक्ष रासप म, रिपाइं यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी भाजपचे राजाराम गरुड, माजी आमदार विलासराव जगताप, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, जत पंचायत समिती सभापती मनोज जगताप, उपसभापती विष्णु चव्हाण, माजी सभापती आकाराम मासाळ, तम्माणगौडा पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सुनिल पवार, माजी सभापती बसवराज बिराजदार, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नगरसेवक उमेश सावंत, नगरपरिषदचे विरोधी पक्ष नेते विजय ताड, प्रमोद सावंत, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मिलिंद पाटील, युवा मोर्चा तालुका कोषाध्यक्ष बंडू डोंबळे,अल्पसंख्याक आघाडी तालुकाध्यक्ष सद्दाम अत्तार, संजय तेली, लक्ष्मण बोराडे, पापा कुंभार, आण्णा भिसे, कुमार कोळी आदी उपस्थित होते.






अजितकुमार पाटील म्हणाले, रासप हा स्वाभिमानी पक्ष आहे. स्वाभिमानासाठी पक्षाने कायम त्याग केला आहे. संघर्ष हा आमच्या रक्तात आहे तर मैत्रीत आम्ही विश्वासघात कधी करत नाही. या निवडणुकीत भाजप बरोबर आपली युती असून काम करण्याचा आदेश रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यात एकमेव जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांनी मित्र पक्षाला विश्वासात घेतले आहे. त्यांच्या विश्वासाला रासप तडा जावू देणार नाही. प्रामाणिकपणे काम करू. संग्रामसिह देशमुख यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी जिल्ह्यातील रिपाइं महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.









जत : पदवीधर मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित मित्र पक्ष बैठकीत बोलताना रासपचे माजी जिल्हाध्यक्ष अजितकुमार पाटील. यावेळी भाजपचे राजाराम गरुड, विलासराव जगताप, संजय कांबळे आदी.

Blogger द्वारे प्रायोजित.