Header Ads

हृदय जिंकून नाती जपणं ही मोठी लढाई जिंकण्यापेक्षाही मोठं काम

नाती सामाजिक स्वरूपात आल्यावरच खूप महत्त्वाची बनतात,आणि याला सामाजिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक आधार आहे. म्हणूनच, आयुष्य योग्य दिशेने चालण्यासाठी नातेसंबंधांचे महत्त्व नाकारले जाऊ शकत नाही आणि सांगायचा मुद्दा असा की, संपूर्ण जग नात्याच्या मूलभूत पायावर टिकले आहे. माणूस  जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक प्रकारची नाती जगतो.  'नाते' हा शब्द म्हणायला खूपच चांगला आणि आनंददायी वाटतो, पण हृदय जिंकून नाती जपणं ही मोठी लढाई जिंकण्यापेक्षाही मोठं काम आहे.
ही लढाई माणसाचे मन आणि डोकं खंगाळून काढते. माणसं अनेक प्रकारची नाती जगतात, मात्र ती निभावताना संपूर्ण आयुष्य डावावर लावतात. नात्यांशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे.  ते व्यस्ततेच प्रतीक आहे,जे साधारपणे तीन ध्रुवांवर टिकले आहे. काही नाती जन्मजात रक्ताची असतात, काही संबंधित असतात आणि काही नाती भावनांनी बनलेली असतात,जी कधीकधी रक्ताच्या नात्यापेक्षा महत्वाची ठरतात.







कौटुंबिक नाती इमारतीच्या पायासारखी असतात,जी जन्मापासून मृत्यूपर्यंत चालत राहतात आणि उपयोगालाही येत असतात. नाती भिंतींसारखी असतात,जी पायाच्या मजबुतीच्या आधारावर चालतात आणि मैत्रीचे संबंध सुसंगततेच्या आधारावर कार्य करतात. आणि अनुकूलतेच्या आधारावर चालतात. आता प्रश्न असा आहे की,आपण नाती बनवायची कशी आणि निभावायची कशी?  एकदा का नातेसंबंध तयार झाले की ते सांभाळून ठेवा, जेणेकरून ते 'मैलाचे दगड' ठरतील.  नाती भावना आणि इच्छेने भरभराटीला लागतात. आणि जोपर्यंत ती अस्तित्त्वात असतात, तोपर्यंत संबंध कायम राहतात. जिथे या दोन्ही गोष्टी मृत्यूपंथाला लागतात, तिथे नाती ढासळायला लागतात.






नाती निभावण्याची जबाबदारी समजून घेणे फार महत्वाचे आहे, ज्यात स्वार्थ आणि गरजा शोधत राहणं समस्या निर्माण करतं.   जेव्हा आपण  चांगल्या वागण्याने नाती सजवतो, तेव्हाच ते संबंध अधिक दृढ होतात.  नाती अधिक मजबूत करणे आणि एकमेकांना समजून घेणे महत्वाचे आहे.  कधीकधी दुर्लक्ष केल्याने नात्यात कडवटपणा येतो. आपण आपल्या प्रियजनांचा सन्मान करू, परस्पर विश्वास कायम ठेवू तरच नात्याचे बंध आणखी मजबूत होतील. परस्परसंवादाचा अभाव असतो, तेव्हा नाती विखुरायला लागतात.








सध्याच्या वेगवान बदलत्या काळात, नात्यातील उबदारपणा दिवसेंदिवस कमी होत आहे.  लोकं दाट मैत्री बनवायला घाबरत आहेत.  प्रत्येक माणसाच्या स्वभावातील फरक त्याला इतरांपेक्षा वेगळे करतो. खरे तर ज्या दिवशी आपल्याला समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, केवळ त्याचा विचार आपल्यापेक्षा वेगळा आहे, त्या दिवशी नात्याची खोली समजून येईल.  नात्यात मतभेद असतील, पण ते मनामध्ये बदलू नये.  धैर्य ही एक अशी सवारी आहे, जी कधीही त्याच्यावर स्वार झालेल्याला खाली पडू देत नाही. इतकंच काय ते ना कुणाच्या पायांवर, ना कुणाच्या नजरेतूनही पडू देत नाही. 
नाती निभावताना ना उंची मोठी असते, ना पाय! मोठा तो असतो,जो अडचणींच्या वेळी पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो.चांगलं मन आणि चांगला स्वभाव दोन्ही नात्यांसाठी आवश्यक आहेत. चांगल्या मनामुळे काही नाती बनतात आणि चांगल्या स्वभावामुळे ती आयुष्यभर टिकतात. एक गोष्ट मात्र खरी की, इछा आणि समाधान आपल्या माणसाकडूनच मिळते,पण कधीकधी संकटंदेखील आपल्या माणसांकडूनच मिळतात आणि  हसू पण आपल्याच लोकांकडून मिळते.







कधीकधी नाती परिस्थितीमुळे जुळतात किंवा तुटतात. उलट विपरीत परिस्थितीत विचार करा की, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भिडणं चालूच राहणार आणि  जोपर्यंत नातं आहे तोपर्यंत जखम ही होतच राहणार.  आपली कृती, भावना आणि मार्ग योग्य असेल तर आपल्याला इतरांकडूनही सन्मान, आसक्ती मिळेल.  नातेसंबंधाच्या मध्यभागी 'वाणी' देखील असते,जी पाहिजे तेव्हा हृदय 'जिंकू' शकते. वैद्यकीय विज्ञान सांगते की, जीभेवर होणारी इजा त्वरीत बरी होते आणि ज्ञान सांगते की,जिभेमुळे झालेली इजा कधीच बरी होत नाही.  नाती बनवायला आणि निभावायला बरीच वर्षे लागतात, परंतु नाती तोडायला एक क्षणही पुरेसा आहे.








नात्याच्या खोलीसाठी आमच्या सगळ्या खुब्या कमी पडतात आणि गमावण्यासाठी एक चुकदेखील पुरेशी ठरते. नात्यात कित्येकदा क्रोध एकटाच येतो,पण सगळं काही चांगलं आहे, ते घेऊन जातो. धैर्य देखील एकटाच येतो, परंतु सर्व चांगुलपणा देतो.  जेव्हा परिस्थिती विपरीत असते, तेव्हा व्यक्तीचा 'प्रभाव, ज्ञान आणि पैसा' नव्हे तर 'निसर्ग आणि नाती' उपयुक्त ठरतात.  काही लोक अहंकाराने नातेसंबंध खराब करतात. 
नाती जोडणं काही मोठी गोष्ट नाही,पण जोडून राहणं  मोठी गोष्ट आहे.  जे नाते खरोखरच खोलवर असते, ते कधीही आपुलकीचा गाजावाजा करत नाही.  नाती एकदाच बनतात, पण आयुष्य त्यांच्यासोबत  चालत राहतं. रुसवे-फुगवे श्वास असेपर्यंत चालू राहतात, नंतर मात्र पश्चातापच उरतो.  विचार पिरगळले जातात,  तेव्हा प्रत्येक नात्यात खरचटलेपणा येतो.   विश्वास तुटल्याचा  आवाज येत नाही, परंतु त्याचे प्रतिध्वनी आयुष्यभर ऐकायला येतात. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, अहंकाराचे टोक आणि कपटपणाची कुऱ्हाड  नात्याला घायाळ करते. नात्याला कधीच नैसर्गिक मृत्यू येत नाही. कधी तिरस्कार केल्याने ,कधी दुर्लक्ष केल्याने तर कधी गैरसमज करून घेतल्याने माणूस नात्याचा खून करून टाकतो.




-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Blogger द्वारे प्रायोजित.