सोन्याळ | गाव उद्यापासून पाच दिवस बंद | कोरोना ससर्गं रोकण्यासाठी खबरदारीचा उपाय |
सोन्याळ,वार्ताहर : जत तालुक्याच्या सीमेला असलेल्या सोलापूर आणि विजयपूर येथे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन गावाच्या नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून सोन्याळ ग्रामपंचायतीने उद्या दिनांक 2 मे ते 6 मे पर्यंत असे पाच दिवस सोन्याळ लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत आणि ग्रामस्तरीय कोरोना कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.नागरिकांनी याचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतने केले आहे.
या काळात गावातील किराणा दुकान, भाजीपाला, छोटे-मोठे उद्योग व्यवसाय बंद राहणार असून केवळ दवाखाना व औषध दुकान पूर्ण दिवस सुरू राहणार आहेत. आणि दूध संकलन सकाळी व संध्याकाळी ठरवून दिलेल्या वेळेत आणि गावापासून लांब एक किलोमीटर अंतरावर करण्यात येणार आहे. या लॉकडाऊन काळात लोकांनी घरीच थांबावे, सुरक्षित राहावे.
अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जाणार्यांनी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या किंवा इतर ठिकाणावरून बाहेरून गावात येणार्या लोकांची माहिती त्या कुटुंबाने ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी,आशा वर्कर्स यांच्याकडे द्यावी, अशी माहिती त्या कुटुंबाने लपून ठेवल्यास त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा सूचना ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आल्या. या बैठकीस सरपंच सौ. संगीता निवर्गी, उपसरपंच सौ. सुमन कांबळे, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल बिरादार, तलाठी सौ नूतन मोहकर, सदस्य विजयकुमार बगली, काडसिद्द काराजनगी, हणमंत पुजारी,सिद्दप्पा मुचंडी, जक्कु निवर्गी व इतर ग्रामपंचायत सदस्य आणि कोरोना कमिटीचे सदस्य उपस्थित होते.