Header Ads

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने 'निर्भया वॉक'


 




अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने 'निर्भया वॉक'

 

जत,(प्रतिनिधी): समाजात विवेक जागृत करणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे, गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर, प्रा. डॉ.एम.एम.कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली आहे. मात्र खुन्यांचा शोध लावण्यात पोलीस आणि सरकार यांना अपयश आले आहे. हत्येचा छडा लावण्यात यावा,यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जत तालुका शाखेच्यावतीने शहरातून 'निर्भया वॉक' करण्यात आला.ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्षे झाली,परंतु अद्याप खुनी पकडण्यात आले नाहीत. हीच परिस्थिती गौरी लंकेश, डॉ. कलबुर्गी, दाभोळकर यांच्या तापासाबाबत आहे. विचारवंतांच्या खुनाचा लवकरात लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने 'निर्भया वॉक'चे आयोजन करण्यात आले होते. जत शाखेच्यावतीनेही शहरातून 'निर्भया वॉक' काढण्यात आला. निर्भया वॉकची सुरुवात शिवाजी पेठेतील शिवाजी पुतळ्यापासून झाली. राममंदिर, जत वाचनालय, लोखंडी पूल, दगडी पूल, संभाजी चौक मार्गे निर्भया वॉक काढण्यात आला. शिवाजी पुतळ्याजवळ सभा घेण्यात आली. यावेळी विचारवंतांच्या खुनाचा छडा लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या 'निर्भया वॉक' मध्ये चंद्रसेन मानेपाटील, रवी सांगोलकर, विक्रम ढोणे, इब्राहिम नदाफ यांनी यावेळी आपले विचार मांडले. यावेळी मच्छिंद्र ऐनापुरे, कॉ.अर्जुन कुकडे, सुनील सूर्यवंशी, दत्तात्रय शिंदे, टी. एम. वाघमोडे, प्रा.पी. एम. डहाळके, भूपेंद्र कांबळे, नजीर चटटरकी, विनायक माळी, संजय माने आदी सहभागी होते.

 

 


जत येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने 'निर्भया वॉक' करण्यात आला.

 





 


Blogger द्वारे प्रायोजित.