डफळापूर | द्राक्ष व्यापाऱ्यांच्या आरेरावीला शेतकऱ्यांचा चाप | बैठकीत निर्णय : योग्य वजन,दर,रोख बिल,अटी न माननाऱ्या व्यापाऱ्यांवर रोक
डफळापूर, वार्ताहर : यापुढे द्राक्ष व्यापाऱ्यांची आरेरावी सहन केली जाणार नाही.योग्य दर,मालाचे बिल रोख, इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन,सुट पध्दत बंद करण्यात येईल,अशी भूमिका डफळापूर ता.जत परिसरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी घेतली आहे.बागायतदारांची नुकतीच डफळापूर येथे बैठक झाली.यावेळी सुमारे दोनशे बागायतदार शेतकरी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून येथील शेतकऱ्यांकडून निसर्गाशी दोन हात करत द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते.दुष्काळ, अवकाळीचा फटका सहन करत आलेल्या उत्पादनाचा व्यापाऱ्याकडून दर पाडण्याचे प्रकार होतात.द्राक्षाचे वजन करणारे काटेही प्रमाणित नसतात,त्यात मोठ्या प्रमाणात वजन कमी करण्यात येते.त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो.त्यामुळे यापुढे इलेक्ट्रॉनिक काट्याशिवाय माल घेणाऱ्या व्यापाऱ्यांना माल दिला जाणार नाही.
त्याशिवाय माल खरेदीसाठी पेटीमागे दीड ते दोन किलोपर्यत सुट हा नवा प्रकार उदयास आला आहे.यात शेतकऱ्यांना लुटण्याचे प्रकार होत आहेत.अशी कोणतीही सुट पध्दत यापुढे चालणार नाही.अशा अरेरावीमुळे बँकाची कर्जे,सावकाराकडून औषधासाठी घेतलेले कर्ज,एकवेळ बायकाचे दागिणे गहान ठेवून,पोटाला पिळ देऊन आणलेले पिक मातीमोल दराने विकावे लागत आहे.कमी दराने दिलेल्या द्राक्षचे बिलही वेळेत दिले जात नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत जात आहे.दुसरीकडे व्यापारी मालामाल होतानाचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर डफळापूर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत अशा आरेरावी रोकण्यासाठी पाऊल उचलले आहे.बैठकीत ठरविलेल्या अटी न स्विकारणाऱ्या व्यापाऱ्यांना यापुढे माल दिला जाणार नाही.यापुढची शेतकऱ्यांची बैठक येत्या रविवारी होणार आहे.
- याला विरोध
- प्रमाणित नसलेल्या वजन काट्याला विरोध
- प्रत्येक बॉक्स मागील वजनातील सुट नाही
- घेतलेल्या मालाचे जागेवर बिल द्यावे लागेल
- मालाच्या दर्जानुसार मार्केटनुसार दर द्यावा लागेल
- अटी न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांना माल दिला जाणार नाही.