Header Ads

भारत अमेरिका संबंध प्रगतिपथावर





अमेरिका आणि चीन या आज जगातील सर्वाधिक शक्तिशाली महासत्ता आहेत. अमेरिकेला शह देऊन चीनला जगावर राज्य गाजवायचे आहे त्यासाठी चीनला आधी आशिया खंडावर कब्जा मिळवायचा आहे त्यासाठी ते आशिया खंडातील छोट्या छोट्या देशांना आपल्या अंकित आणण्याच्या प्रयत्न करीत आहेत. विशेषतः हिंद महासगरातल्या देशांवर चीन आपली हुकूमत गाजवू इच्छित आहे. चीनच्या या महत्वाकांक्षेला आशिया खंडातील कोणता देश आव्हान देऊ शकतो तर तो भारत आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणात भारतच मुख्य अडसर ठरेल हे चीन जाणून आहे त्यामुळेच भारताच्या सीमेवर सैन्याची जमवाजमव करून तर कधी भारतीय हद्दीत घुसखोरी करून भारतावर दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे अर्थात चीनच्या या खेळींना भारत बळी पडत नाही कारण आजचा भारत हा १९६२ चा भारत नाही तर तो २०२२ चा भारत आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणाला भारत जशास तसे उत्तर देत आहे. 


चीन विरोधातील लढ्यात अमेरिकेनेही भारताला साथ दिली आहे कारण अमेरिकाही चीनला आपला शत्रू मानते म्हणूनच भारत आणि चीन संरक्षण विषयक अनेक करार झाले आहेत. जर चीनला रोखायचे असेल तर भारताला मदत करावीच लागेल हे अमेरिकाही जाणून आहे. आशिया खंडात  चीनच्या अरेरावीला भारतच उत्तर देऊ शकतो हे जाणूनच अमेरिका भारतासोबत  अनेक करार करीत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या २+२ संवादादरम्यान यु एस मिलिटरी सिलिक्ट कमांडच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी भारतीय शिपयार्ड वापरण्याच्या शक्यतेचा शोध घेण्यात आला. त्यानंतरही दोन्ही देशात संरक्षण विषयी अनेक करार झाले. चीनला शह देण्यासाठी तयार झालेल्या क्वाड संघटनेतही भारत आणि अमेरिका या देशांमध्ये चीनला शह देण्यासाठी अनेकदा महत्वपूर्ण चर्चा झाल्या आहेत. जपान आणि ऑस्ट्रेलिया हे या संघटनेतील इतर  देश आहेत ते ही चीनला शह देण्यासाठी भारत आणि अमेरिकेसोबत आहेत. दरम्यानच्या काळात भारतीय नौदलाने  सहयोगी सदस्य म्हणून संयुक्त सागरी दल या बहरिन आधारित बहुपक्षीय भागीदारीसह औपचारिकपणे सहकार्य सुरू करून चीनला योग्य तो इशारा दिला आहे. 


भारताने आपल्या प्रादेशिक सुरक्षा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी  या गटात सामील होण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे. भारताचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व या राष्ट्रांमध्ये सामायिक सुरक्षा निश्चित करण्याच्या सामूहिक जबाबदारीच्याप्रती भारतीय बांधीलकीचे प्रदर्शन म्हणून पाहत आहे. चीनला शह देण्यासाठी भारत सावधपणे पावले टाकत आहे त्याला अमेरिका चांगल्या प्रकारे साथ देत आहे हे जरी खरे असले तरी घाईने लगेच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचणे शक्य नाही. भारत अमेरिका संबंध आणखी बळकट होण्याची गरज आहे ते जर आणखी बळकट झाले तरच चीनला शह देता येईल आणि चीनच्या विस्तारवादी धोरणाला लगाम लावता येईल. 


श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे

Blogger द्वारे प्रायोजित.