Header Ads

सांगली | शेती साहित्य विक्रीची दुकाने तात्काळ सुरू करा : महेश खराडे


 


 

सांगली,प्रतिनिधी : ठिबक सिंचन, मलचींग पेपर,आणि प्लास्टिक पाइप,विक्री ताकाळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा सदर साहित्य विक्रीची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केली,  




जिल्हाध्यक्ष खराडे पुढे म्हणाले कि,सध्या लॉकडाऊनचा कालावधी सुरू आहे. सरकारने प्रतिबंधक उपाय म्हणून अनेक गोष्टींवर निर्बंध घातले आहेत. यातून अत्यावश्यक बाब म्हणून शेती आणि शेतीशी निगडित उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातलेली नाही. परंतु शासन आदेशात स्पष्टता नसल्याने प्रशासनाकडून ही सर्व दुकाने सरसकट बंद केली जात आहेत.यामुळे शेतकऱ्यांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सद्या तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे, त्यामुळे पिकांना पाण्याची प्राधान्याने गरज आहे. यासाठी ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरची शेतकऱ्यांना गरज भासते.करोनाचा प्रकोप सुरू होण्याआधी शेतकऱ्यांनी रोपवाटिकेत भाजीपाला रोपांची नोंदणी केली होती, ती रोपे आता शेतात येऊन पडली आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक ठिबक सिंचन, पाइप आणि मल्चिंग पेपर शेतकऱ्यांना उपलब्ध होत नसल्याने पाण्याअभावी रोपे जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर ऊस, केळी या  सारख्या पिकांना तीव्र उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची अत्यंत गरज भासत आहे. या पिकांना वेळेत पाणी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे ठिबक सिंचन,मल्चिंग पेपर निर्मिती करणारे कारखाने आणि विक्री दुकाने त्वरीत सुरू होणे आवश्यक आहे. नाहीतर पाण्याअभावी पिके वाळून जाण्याचा धोका आहे. त्याचबरोबर हे साहित्य वाहून नेण्यासाठी जिल्हाबंदी आणि राज्य बंदीउठवावी. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शेतीशी निगडित साहित्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला परवानगी आहे. त्यामुळे या आदेशाचे पालन होणे गरजेचे आहे. तरच करोनाच्या या अस्मानी संकटात राज्यातील शेतकरी तग धरू शकेल. त्यामुळे ठिबक सिंचन विक्रीसाठी तत्काळ परवानगी द्यावी. तसे आदेश संबंधित विभागाने जिल्हा उद्योग केंद्रांच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आणि कृषी विभागाला द्यावेत.




 


 

Blogger द्वारे प्रायोजित.