Header Ads

दिनराज वाघमारे ; संवेदनशील पत्रकार : किरण जाधव यांनी उलघडला जीवनपट

सच्चा मित्र मार्गदर्शक आणि संवेदनशील पत्रकार ; दिनराज वाघमारे 





जतच्या मातीत कुसळसुद्धा उगवत नाहीत म्हणतात , पण याच मातीने अनेक हिरे मात्र विविध क्षेत्रात तयार केले आहेत. अशाच समाज माध्यमातील पत्रकारिता क्षेत्रातील  एक हिरा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार,  नवोदितांचे मार्गदर्शक,  निर्भीड आणि ज्यांची लेखणी नेहमीच आमच्यासारख्यांना दिपस्तंभ ठरते ते जत तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष दिनराज वाघमारे ! त्यांचा आज वाढदिवस ...


खरं तर ज्यांची उभी हयात समाजाचं प्रतिबिंबित्व उमटवण्यात जाते,  वृत्तपत्रात काम करताना अनेकांचे वाढदिवस साजरे करताना ज्यांच्या लेखणीतून व्यक्तिमत्व रेखाटली जातात , त्या पत्रकाराचा वाढदिवस किंवा त्याच्या बद्दल समाजात आजही फारस कोणी बोलत नाही,  लिहित नाही असो ...पण समाजाच्या मनात कायम घर करून राहणाऱ्या खऱ्या पत्रकाराचे अढळ स्थान मात्र कुणी कधीच हिराऊ शकत नाही हे देखील सत्य आहे.मी दिनराज याना 1999 पासून ओळखतो त्यावेळी मी नवखा पत्रकार होतो , शेगाव मधून तरुण भारतसाठी बातमीदारी करायचो,  त्यांना भेटण्याचा पहिला योग मला त्याचवेळी आला. शिवाजी पेठेतील दहा बाय दहाच्या खोलीत त्यांचे कार्यालय होते एके दिवशी सकाळीच मी आणि आमच्या कार्यालयाचे सुधीर संकपाळ  त्यांच्याकडे गेलो , दहा बाय दहाच्या खोलीत एक टेबल व एक खुर्ची आणि आजूबाजूला पेपरचे गठ्ठे , अनेक मासिके , पुस्तके होती.धूळ देखील मोठ्या प्रमाणात होती , इतक मोठं गबाळ पाहून मी दिवसभर विचार करत होतो मोठा पत्रकार म्हणजे मोठ गबाळ गोळा करायला लागतय,पण हळूहळू पत्रकारितेतील बाळकडू मिळत गेले आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत गेली .पत्रकारिता ही एक अशी प्रणाली आहे की यात काम करणाऱ्या माणसाच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानार्जन व ज्ञानदान संपत नाही,खरेतर दिनराज यांच्या पत्रकारितेने जत तालुका अनेक वर्ष गाजला आणि गाजतो ही आहे,  अतिशय संवेदना जपणारा हा माणूस आहे .प्रचंड अभ्यास, शांत वृत्ती,नव्या विषयाचा अभ्यासुपणा, शिक्षण,शेती , सहकार,सामाजिक बांधिलकी, प्रशासन , राजकारण इतकेच नव्हे तर जतच्या ऐतिहासिक संस्थांना पासून ते जतच्या मातीतले काय गुणधर्म इथपर्यंत ते  जतच्या हजारो वर्षांचा इतिहास काय सांगतो ? याचं चालतं बोलतं विद्यापीठ त्यांच्यात ठासून भरलेले आहे !


दिनराज याना जत व जिल्ह्यातील राजकारण व समाजकारनाची खडान खडा माहिती आहे,  कोणीही झोपेत त्यांना या गावाचा इतिहास काय ? आसा प्रश्न विचारताच हा माणूस त्या गावाचा उभा-आडवा इतिहास नजरेसमोर उभा करतो.


तब्बल 30 वर्षाच्या जतच्या पत्रकारितेच्या झनझावतात  या माणसाने लेखणीला मोठी धार आणली. महाराष्ट्र कर्नाटकातील कुख्यात श्रीशैल टोळीची लेखमाला, जतच्या इतिहासाची सुवर्ण पाने असोत की हेमाडपंती मंदिरांची ओळख असो दुष्काळाची दाहकता , प्रशासनातील अधिकाऱ्यांवरचे आसूड  असोत अथवा राजकारण्यांची केलेली  चिरफाड असो, तसेच आकाशवाणीवरील अनेक वार्तापत्रे ,  विविध विषयावरचे लेखन हे नेहमीच चर्चेचे विषय ठरले आहेत.यापुढे जाऊन सांगायचे तर जतसारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करणारा हा माणूस नेहमीच निकोप आणि दर्जेदार लिखाण करीत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, मला अजून आठवतंय त्यांनी तरुण भारत मद्ये शिक्षकदिनी साने गुरूजींना एक अनावृत्त पत्र लिहिले होते , या पत्राचा आशय इतका मोठा होता की जिल्हाभर या पत्राची चर्चा झाली होती .अशा वेगळ्या विषयाच्या संकल्पना जतच्या मातीतून लिहिणारा व रुजवणारा हा पत्रकार !


दिनराज यांच्या व्यक्तिमत्ववात अनेक  वैशिष्ट्य दडलेली आहेत .निसर्गावर अपार प्रेम करणारा आणि निसर्गप्रेमी हा पत्रकार आहे .वृक्ष, माती,  दगड,  गोटे,  जलसंधारण, जलसाक्षरता , जतची पाणी चळवळ , दुष्काळ यावर संवेदना बाळगणारा हा  माणूस. त्यासोबत जैविक शेती आणि आयुर्वेद हा देखील त्यांच्या आवडीचा विषय राहिला आहे.यासोबत नेहमीच नवे प्रयोग करणे हा त्यांचा पिंड  आहे . कधी पाणी परिषद तर कधी अवैध धंदे  विरोधात उपोषण तर कधी ग्रामीण पत्रकार यांच्या उन्नतीसाठी नवे विषय समोर ठेवणे, गरीब, दुःखी पत्रकारांना मदत करणे, दवाखान्यात दाखल करणे असो की गावकुसाबाहेर राहणाऱ्या समाजातील मुलांचे शिक्षण असो असे अनेक उपक्रम त्यांनी मनापासून राबवले.इतकेच काय तर पत्रकारिता क्षेत्रात नवी मुले यायला तयार नसणाऱ्या आजच्या काळात या माणसाने याच मातीत पहिलं  दैनिक सुरू करून काहीकाळ चालवलं .दैनिक बंद पडल्यावर पुन्हा नव्या उमेदीने जय भारत न्यूज व वेब पोर्टल सुरू केले. एका पुस्तकाची निर्मिती त्यांनी केली असा प्रयोगशील बातमीदार म्हणून ही आम्ही त्यांच्याकडे पाहतो आहे.खरंतर आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनराज यांच्यासाठी हा शब्दप्रपंच देखील मुद्दामून केला आहे , कारण आज वृत्तपत्र आणि सोशल मीडिया यात खूपच विखारी स्पर्धा सुरू आहे .समाजात अनेक  विरोधक पत्रकारांना तर रोजच भेटतात पण आजच्या विखारी स्पर्धेत आमच्यातले आमचे वैरी होत आहेत , हे खूपच निकोप पत्रकारितेच्या दृष्टीने घातक  आहे , वास्तविक पत्रकार हा आगोदर एक माणूस आहे , त्याच्या सुख-दुःखात एकीचे बळ एकवटले पाहिजे. तशी भावना सगळ्यांमध्ये  रुजायला हवी, कारण ती काळाची गरज आहे !


दिनराज यांना वाढदिवसानिमित्त खुप सार्‍या शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य चांगले आरोग्य लाभो आणि त्यांचे सर्व संकल्प पूर्ण होओत याच मनस्वी सदिच्छा...!


 


लेखन ;


किरण जाधव


अखिल भारतीय पत्रकार परिषद जत


Blogger द्वारे प्रायोजित.