'आँनलाईन' मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान अमोल वेटम ; अभ्यासू विद्यार्थ्यांचे नुकसान
सांगली : कोविड कालावधीत सुरु झालेले ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षा यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची लॉटरी लागली. जवळपास दोन वर्षाहून अधिक काळ अशाच प्रमाणे परीक्षा सुरु ठेवून अनेक विद्यार्थ्यांचे संपूर्ण कोर्सच या कालावधीत पूर्ण झाले व घवघवीत मार्क्स प्राप्त झाले. परंतु सध्या स्थितीत कोरोना प्रादुर्भाव नसतानाही शिवाजी विद्यापीठ प्रशासन हे काही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बळी पडत विविध अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन एमसीक्यू परीक्षा सुरूच ठेवल्या आहेत. याचा मोठा फटका नियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे तसेच त्यांच्या मेरीटवरही परिणाम होताना दिसत आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन एमसीक्यू परीक्षामुळे कॉपीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. ऑनलाईन परीक्षा मध्ये गुगल सर्च करून उत्तर मिळवणे सहज सोपे झाले आहे. विद्यार्थ्यांची वाचनाची, शिक्षण घेण्याची आणि लिखाणाची सवय मोडली आहे.
ज्या लेखी परीक्षात याआधी पास होणे देखील कठीण होते अशा विषयात देखील पैकीच्या पैकी गुण विद्यार्थ्यांना बहुपर्याय परीक्षा मुळे मिळत आहे. लेखी परीक्षाला पर्याय म्हणून विद्यापीठाने ऑफलाईन एमसीक्यूची भुरळ घातली. यातून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले. विधी, अभियांत्रिकी व इतर कोर्सेस करिता लेखी परीक्षा होणे गरजेचे आहे.